
मनमाड (प्रतिनिधी) ता. ५ :
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, काव्यलेखनाची गोडी वाढावी तसेच त्यांच्या सुप्त प्रतिभेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मनमाड साहित्य संघाच्या वतीने शहरात काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मनमाड शहरातील तब्बल १४ शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सध्याच्या मोबाईलप्रधान युगात मुलांची लेखनाची सवय कमी होत चालली असून त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्ती व भाषिक अभिव्यक्तीवर होत असल्याचे जाणवत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये लेखनसंस्कार रुजावेत, काव्यनिर्मितीची प्रेरणा मिळावी आणि मराठी भाषेबद्दल आत्मीयता वाढावी या हेतूने साहित्य संघाने हा नवा शहर पातळीवरील शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम हाती घेतला आहे.
या स्पर्धेसाठी इयत्ता ७ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांना स्वरचित व स्वलिखित कविता सादर करावयाच्या आहेत. विविध शाळांकडून प्राप्त होणाऱ्या कवितांमधून उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या बालकवींची निवड करण्यात येवून निवड झालेल्या कवितांचे सादरीकरण २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी भाषा दिन कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना संघाचे अध्यक्ष प्राचार्य सदाशिव सुतार, कार्यवाह अमोल खरे, सचिव जनार्दन देवरे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. रवींद्र सुर्वे, कोषाध्यक्ष विकास काकडे, संदीप देशपांडे, डॉ जे वाय इंगळे, प्रदीप गुजराथी, शांताराम वाघ, अशोक परदेशी, नरेश गुजराथी, मंदोदरी पाटील, प्रिया परदेशी राजू लहिरे, डी. डी. पाटील, हेमंत वाले, सुरेंद्र भुजंग, डी. टी. पवार आदींनी दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी ओढ निर्माण होऊन भविष्यात कवी, लेखक आणि विचारवंत घडण्यास मदत होईल, असा विश्वास संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे मनमाड साहित्य संघाने कळविले आहे.
