
विंचूर दि.२(प्रतिनिधी, संदिप शिरसाट)परमेश्वराने आपल्याला दिलेला मानव देह हा मला काही मिळावे यासाठी नसून मला समाजाला काही देता यावं यासाठी आहे.आपला धर्म आपलं आध्यात्म समाजाला निट कळलं पाहिजे. समाज हळूहळू प्रौढ व प्रगल्भ झाला पाहिजे, आत्माराम कळाला तर राम कळतो.राम तत्व आत्मसात करून पारिवारिक जीवन समृद्ध करावे. परमार्थ मनोरंजनाचे साधन नाही.परमार्थ करतांना बाह्य सजावटी कडे न बघता अंतर सजावटी कडे लक्ष द्यावे.परमार्थ व पुरुषार्थ समजून घेतला पाहिजे.कारण पुरुषार्थ हा आपल्या अध्यात्माच्या आधार आहे.असे प्रतिपादन नागपूर येथील विद्यावाचस्पती ह.भ.प. विवेक घळसासी यांनी केले.घळसासी हे येथील अपर्णा प्राईड मंगल कार्यालयात कै.विमल वासुदेव दुसाने यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त आयोजित संगितमय रामकथा समारोपाचे सातवे पुष्प गुंफताना बोलत होते

कै.विमल दुसाने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित रामकथेस उपस्थित जनसमुदाय
.पुढे बोलताना घळसासी यांनी समाजात नेहमी गरीबांचाच बळी दिला जातो.परमेश्वर कधीही दुर्बलांच्या पाठीशी नसतो. तर पराक्रमी व बलशालींच्या पाठीशी असतो.त्यामुळे मुलांना हनुमाना प्रमाणे बलाढ्य, पराक्रमी व शुर बनवा.मुलांना बेकरी पदार्थ व फास्ट फूड खायला न देता घरचे सकस अन्न द्या.तसेच नियमित व्यायाम व योगासने करण्यास प्रवृत्त करा. स्वत: आत्मनिर्भर होऊन राष्ट्र आत्मनिर्भर करा. असे सांगितले. यावेळी वारकरी सांप्रदाय व विंचूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप कोथमिरे यांनी केले. तर अविनाश दुसाने यांनी आभार मानले.
