
अहिल्यानगर. (प्रमोद डफळ ,प्रतिनिधी) अहिल्यानगर राहुरी विद्यापीठ, दि. 20 ऑगस्ट, 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या विद्युत मोटरचलित भुईमूग शेंगा तोडणी यंत्र व ट्रॅक्टरचलित फळबाग तण कापणी यंत्र या दोन यंत्रांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट प्रदान केले आहे. या दोन यंत्रांच्या संशोधनात महत्वाचे योगदान देणारे अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड तसेच त्यांचे सहकारी डॉ. रवीकिरण राठोड, डॉ. संजय भांगरे, इंजि. गोविंद काळे यांचे नांव पेटंट प्रमाणपत्रावर नमुद करण्यात आले आहे. सदरचे पेटंट मिळविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्युत मोटरचलित भुईमूग शेंगा तोडणी यंत्राची सरासरी तोडणी क्षमता 178 किलो प्रति तास असून लहान व सीमांत शेतकर्यांसाठी उपयुक्त आहे. या यंत्राच्या वापरामुळे वेळेमध्ये 82% व खर्चामध्ये 96% पर्यंत बचत होते. ट्रॅक्टरचलित फळबाग तण कापणी यंत्र 24 अश्वशक्ती आणि त्यापेक्षा जास्त अश्वशक्ति असणार्या ट्रॅक्टरने सहज चालविता येते. या यंत्रामध्ये रुंदी समायोजित करण्याची सोय असल्यामुळे ते विविध फळबागांमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त आहे. या यंत्राच्या वापरामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये 80% पर्यंत बचत होते. कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी या पेटंटमध्ये सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. कृषि विद्यापीठाच्या सर्व स्तरातुन संबंधीत शास्त्रज्ञांचे अभिनंदन होत आहे.
