
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण तर्फे प्रत्येक महिन्यातून एकदा मधुबन कट्टा विमला तलाव येथे कवी संमेलन संपन्न होत असते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिराचंद म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मधुबन कट्ट्याच्या ११७ व्या कवी संमेलनात कवि मच्छिंद्र म्हात्रे,अजय शिवकर, हेमंत पाटील, बालकवी अनुज शिवकर, अनामिका राम, समता ठाकूर, तेजस्विनी गायकवाड, रायगड भूषण प्राध्यापक एल. बी पाटील, रामचंद्र म्हात्रे,आदी कवींनी रानभाज्यांवर कविता सादर करून काव्य संमेलनाला एक वेगळीच रंगत आली.कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात मधुबन कट्ट्यावर कादंबरीकार गजानन म्हात्रे यांनी ७७ वर्षांपूर्वी चक्रीवादळाच्या तडाख्याने बुडालेल्या रामदास बोटीच्या आठवणी जाग्या केल्या.यावेळी जेष्ठ पत्रकार जगदीश तांडेल यांनी भविष्यात रानभाज्यांचे संवर्धन करण्यासाठी उरण तालुक्यातील डोंगर माळराने वाचवायला हवी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मच्छिंद्र म्हात्रे यांनी महाराष्ट्रातील रानभाज्यांचा आढावा व महत्त्व विषद केले.त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर येथील साहित्यिक वारीचे अनुभव विषद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील यांनी केले तर या कवी संमेलनास ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत दांडेकर ,चंद्रकांत मुकादम, मारुती तांबे, अनिता शिवकर ,मीना बिष्टरमेश माळी, रवींद्र सूर्यवंशी, महिंद्र सोनवणे ,देविदास पाटील, सुनील पाटील ,अरविंद घरत ,सुरेश ठाकूर,एस ए चव्हाण ,भीमा अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. रायगड भूषण प्राध्यापक एल. बी. पाटील यांनी आगरी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
