
गडचिरोली (प्रतिनिधी) स्थानिक नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली च्या वतीने प्रसिद्ध नाट्यलेखक, नाट्य व सिनेमा दिग्दर्शक, कवी व गझलकार संजय बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ कवी डॉ. देवेंद्र मुनघाटे व राजेंद्र सोनटक्के यांचे उपस्थितीत नुकतेच कविसंमेलन घेण्यात आले. मंचावर नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, कविताविभाग प्रमुख योगेश गोहणे, व नाटककार चुडाराम बल्हारपुरे इ. उपस्थित होते. नाट्यश्रीच्या या मंचावर कवींचा योग्य तो सन्मान केला जातो व नव्या जुन्या कवींना योग्य ती संधी दिल्या जाते. ‘नाट्यश्री’ चा हा उपक्रम १९९७ पासून अव्याहत सुरू असून संमेलन दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असते, हे संमेलन पुढेही असेच चालू राहावे, असे मत संजय बन्सल संमेलनाध्यक्ष यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम नाट्यश्रीने ‘रानगर्भ फुलत आहे’ या कवितेकरीता वाहिलेल्या गृपवरुन सन २०२४ मध्ये वर्षभर घेतलेल्या आठवडी उत्कृष्ट कवी व कविता या उपक्रमांतर्गत पन्नास सत्रातील पुरस्कृत साठ कवींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक व प्रमाणपत्र’ देवून गौरविण्यात आले.

या कविसंमेलनात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर कवींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व आपल्या कविता सादर केल्या. कवितेचे विविध विषय, विविध रंग,प्रेमकविता, भाव कविता, देशभक्ती देशप्रेम, आई व बाप यांची महती सांगणाऱ्या कविता, तसेच कविता व गझल यांची रेलचेल असलेले, सामाजिक जाणिवांसोबत चळवळीच्या कविता, विनोदी कविता, व त्यातून अनेक आशा – अपेक्षा व्यक्त करणारे हे कविसंमेलन होते. अशा या नाविन्यपूर्ण कविसंमेलनास ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच नवोदित कवींनी हजेरी लावून आपापल्या बहारदार रचना सादर केल्या. व संमेलनात चांगलीच रंगत आणली. देसाईगंज येथील नवोदित कवयित्री प्रियंका ठाकरे यांच्या ‘जोडीदार’ या प्रेमकवितेने संमेलनाची सुरुवात झाली. कुरखेडा येथील बाल कवयित्री कु.विधी बन्सोड यांच्या ‘मुखवट्यात’ या कवितेने समाजातील दांभिकतेवर आघात केला तर ब्रम्हपुरी येथील बाल कवयित्री जोशा भर्रे व जिज्ञासा भर्रे या भगिनींचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. नागपूरचे प्रसिद्ध कवी भूषण ठाकरे यांनी ‘व्यस्त माणूस मस्त’ या कवितेतून दु:ख विसरण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी सदा व्यस्त राहा, असा सल्ला दिला.ब्रम्हपुरीचे प्रसिद्ध कवी भिमानंद मेश्राम यांनी ‘दुसरं काही नको मित्रा..’ म्हणत मैत्री जपण्याची अपेक्षा व्यक्त केली तर गायडोंगरीचे पुनाजी कोटरंगे ‘थोडा शाळेत डोकावून पाहतो ‘ या कवितेतून शाळेच्या गतस्मृतींना उजाळा दिला. सावली येथील कवयित्री शैला चिमड्यालवार यांनी सावित्रीबाई फुले यांचेवर कविता सादर केली, तर ज्योत्स्ना बन्सोड यांनी ‘गंधित मोगरा’ सादर करुन कवितेचा गंध या संमेलनात उधळला. प्रभाकर दुर्गे यांनी चळवळीची कविता सादर केली तर सौ. प्रिती ईश्वर चहांदे व प्रमुख अतिथी राजेंद्र सोनटक्के यांनी ‘आई’ या कवितेतून आईची महती सादर केली. आठवडी बाजारात भाजीपाला विकून कवीसंमेलनास आलेले कवी विलास जेंगठे यांनी ‘माझी जोडीदार’ कवितेद्वारे आपल्या जोडीदाराचे कौतुक केले. चंद्रपूरचे प्रसिद्ध कवी सुनील बावणे व गडचिरोलीचे उपेंद्र रोहनकर यांनी झाडी बोलीतील कविता सादर केल्या. प्रसिद्ध कव्वाल वामनदादा गेडाम यांनी गझल सादर केली. तसेच संमेलनाध्यक्ष संजय बन्सल यांनीही अध्यक्षीय कविता सादर करतांना गझल हा प्रकार हाताळला. या कविसंमेलनात प्रियंका ठाकरे, कु. विधी बन्सोड, जोशा भर्रे, जिज्ञासा भर्रे, शिल्पा पाटील, भुषण ठाकरे, सुनील बावणे, साक्षी बन्सोड, केवळराम बगमारे, रेश्मा बावणे, किरण बोरुडे, सोनाली कोसे, प्रभाकर दुर्गे, शैला चिमड्यालवार, प्रिती चहांदे, चरणदास वैरागडे, अपेक्षा खोब्रागडे, तनुजा भोयर, मंदाकिनी चरडे, मारोती आरेवार, आत्माराम बर्डे, पी.डी. काटकर, राजरत्न पेटकर, पुनाजी कोटरंगे, सोनाली सहारे, भिमानंद मेश्राम, रोशनी दाते, अहिंसक दहिवले, सपना कन्नाके, गणेश राजुरवार, सत्तु भांडेकर, सौ. ज्योती म्हस्के, राजेंद्र सोनटक्के, वंदना सोरते, मंगला कारेकर, वंदना मडावी, लता शेंद्रे, स्वप्नील बांबोळे, उपेंद्र रोहनकर, विलास जेंगठे,वसंत चापले, खेमदेव हस्ते, पुरुषोत्तम ठाकरे, तुळशीराम उंदीरवाडे, वर्षा गुरनुले, उकंडराव राऊत, यामिनी मडावी, प्रेमिला अलोणे, भावना रामटेके, नत्थुजी चिमुरकर, एकनाथ बुध्दे, सिध्दार्थ गोवर्धन, डी. के. लक्ष्मण, वामनदादा गेडाम, विजय शेंडे, निळकंठ रोहनकर,रमेश डोंगरे यांचेसह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, लोणार सरोवर इ. सह झाडीपट्टीतील ७८ कवींनी आपापल्या स्वरचित कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कवी संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन योगेश गोहणे यांनी केले. कवींचा व पाहूण्यांचा परिचय प्रा. अरुण बुरे यांनी करून दिला. सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, रमेश निखारे, मारोती लाकडे,निरंजन भरडकर,वसंत चापले, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, जितेंद्र उपाध्ये, चुडाराम बल्हारपुरे व राजेंद्र जरुरकर यांनी मेहनत घेतली. *चुडाराम बल्हारपुरे* (नाटककार)
