
पिंपळनेर(प्रतिनिधी ) पिंपळनेरचे भूमिपूत्र कवी तथा बालसाहित्यिक प्रदिपगुरूजी पिंपळनेरकर ( प्रदिप बाबुलाल पगारे) हे रमाईसुत या टोपन नावाने कविता , लेख व साहित्य लेखन करतात. त्यांच्या ३० वर्षातील शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील काळीज माझं साहित्य या साहित्य संस्थेच्या नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या ८ जुन २०२५ रोजी राज्यस्तरीय काव्यसंमेलनात विविध जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते कवी- प्रदिपगुरूजी पिंपळनेरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे नुकतेच संस्थेचे निवडपत्र प्राप्त झाले आहे. प्रदिपगुरुजी हे पेशाने शिक्षक असून नुकतेच त्यांच्या दोन्ही पायांवर मोठी शस्त्रक्रिया झालेली आहे. अंथरुणाला खिळवून असतांनाही त्यांनी या काळात यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दोन काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यापैकी ” बालमित्रांची छान छान गाणी” हा बालकाव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून ” लाल पाणी मिळे रक्त” या काव्यसंग्रहाच्या लेखनाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच या काळात त्यांनी ३०० पेक्षा जास्त कवितेची रचना करून १५०-२०० सन्मानपत्रे प्राप्त केली आहेत. तसेच विविध ऑनलाइन काव्यसंमेलनात सहभाग घेऊन विविध पारितोषीके प्राप्त केली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल आजारपणाच्या काळात यांना ४-५ पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलेले आहे. आजारपणात त्यांचा १० प्रातिनिधिक काव्यसंग्रहात देखील कवितेचा सहभाग आहे. त्यात पाऊस, मधुगंध, क्रांतीज्योती, वारसा, येरे येरे ढगोबा( बालकाव्यसंग्रह), भीम जन्माची गाथा, रानफूल, वसंत ऋतू, आठवणीचा कोपरा व दर्पण या प्रातिनिधिक काव्यसंग्रहांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या ” बालमित्रांची छान छान गाणी” या बालकाव्यसंग्रहाच्या १००० प्रती छत्रपती संभाजीनगर जिल्हातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मोफत भेट देण्यात येणार आहे. त्याकरिता त्यांनी ” मानवता बुक फाउंडेशन” ची निर्मिती केली असून आपल्या प्रियजनांच्या नावे फक्त १००० प्रतींचा छपाई खर्च देणगी देऊन यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील कोणत्याही एका जिल्हासाठी १००० प्रती वाटाण्यात. यात पहिल्या पानावर त्यांच्या प्रियजनांचा फोटो व त्यांच्या स्मरणार्थ मोफत बालकाव्यसंग्रह वाटप. तर शेवटच्या पानावर ज्यांच्याकडून देणगी मूल्य प्राप्त झाले यांचा नामोल्लेख पुस्तकात असणार आहे. या उपक्रमाची सुरुवात गुरुजींच्या मातोश्रींनी केलेली असून कै. बाबुलाल सखाराम पगारे पिंपळनेरकर यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हातील संपूर्ण जिल्हा परिषद शाळेसाठी श्रीमती रमादेवी बाबुलाल पगारे यांचेकडून देणगी मूल्य प्राप्त झालेले आहे. आपल्या राज्यातील इतर जिल्हांसाठी आपण ९८२३१३५९४ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधून सविस्तर माहिती घेऊ शकता. प्रदिपगुरूजी यांना यापूर्वी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचा आदर्थ शिक्षक पुरस्कार २०१४, लापन्स क्लब ऑफ औरंगाबादचा श्रेष्ठ गुरुजन पुरस्कार, विद्यार्थी सहायता संघ मुंबईचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, मनुष्यबळ विकास अकादमीचा अष्टक्षेत्री गौरव पुरस्कार, अनिस कार्यगौरव राज्य पुरस्कार, मानव प्रबोधन अकादमीचा राज्य पुरस्कार, तसेच पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत आंतरराष्ट्रीय पुरस्कार या विविध पुरस्कारांनी यापूर्वी यांचा सन्मान झालेला आहे. गुरुजींनी आतापर्यंत ४५ वेळा रक्तदान केलेले असून समाजाचा रुहभाग म्हणून १५-१७ लाखांपर्यन्त लोकवर्गणीतून विविध शाळांचा कायापालट केलेला आहे. यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास आमचा मानाचा मुजरा.
