
पणजी (गोवा) (गुरुदत्त वाकदेकर): देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणारा ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड २०२५-२६’ हा भव्य राष्ट्रीय सोहळा दि. ५ एप्रिल २०२६ रोजी कला अकादमी, कॅम्पल, पणजी, गोवा येथील ब्लॅक बॉक्स सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुणे येथील उद्योजक, साहित्यिक, समीक्षक, समाजसेवक, पोलीस मित्र, धर्मरक्षक महामंत्री असलेले विलास तुकाराम बाबर यांना अष्टपैलू कर्तृत्व आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासह ७७ मान्यवरांचा गौरव करत या सोहळ्याने सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्तृत्वाचा प्रभावी सन्मान केला.
सर्किट बेंच फाउंडेशन, डी. एस. राठोड फाउंडेशन आणि शांतिदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, पत्रकारिता, आरोग्य आणि प्रशासकीय क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. समाजपरिवर्तनासाठी प्रेरणा देणे आणि निस्वार्थ कार्याची दखल घेणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
झरी तालुक्यातील मार्की येथील माजी सरपंच तुकाराम धनु जुमनाके यांना “भारतीय पोलीस मित्र” या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यासाठी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोवा विधानसभेचे संयुक्त सचिव ॲड. मोहन गावकर यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील बोपापूर येथील रुपेश पांडुरंग कुत्तरमारे यांनाही सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून समाजजागृती, ग्रामीण विकास आणि स्वयंसेवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पद्मश्री डॉ. प्रकाश एस. पर्येकर, विलास बाबर, गोपीनाथ गावस, गणेश शेटकर, सुनील माहूस्कर, प्रदीप माने, सुमन देसाई, डॉ. मधुकर हुजरे, विनायक पाटील, मिलिंद खोब्रागडे, डॉ. मंजू जाधव, डॉ. किरणताई मोरे, गीता मेश्राम, भाग्यश्री वर्तक, डॉ. अंजली चिंचोलीकर, भूषण ठाकरे, सुरेखा श्रीखंडे, सतीश कुंकळीकर, जयश्री कुंभार यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कालिदास घाटवळ (माजी संचालक, नेहरू युवा केंद्र, भारत सरकार) होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. मोहन गावकर, शिवाजीराव जमदाडे (सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक) आणि विठ्ठल मुरकेवार (सेवानिवृत्त असिस्टंट डायरेक्टर, भारत सरकार) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विठ्ठल जाधव, डॉ. सुरेश डी. एस. राठोड आणि डॉ. गुंडोपंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. अंजली चिंचोलीकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर नियोजनाची जबाबदारी सानिका परबकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा सन्मान करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला. उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
