
मनमाड (प्रतिनिधी)- ता. २६ :
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, काव्यलेखनाची गोडी वाढावी आणि त्यांच्या सुप्त प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मनमाड साहित्य संघाच्या वतीने शहरात काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
सध्याच्या मोबाईलप्रधान युगात विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी होत चालल्याने त्यांच्या स्मरणशक्ती व भाषिक अभिव्यक्तीवर परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये लेखनसंस्कार रुजावेत, काव्यनिर्मितीची प्रेरणा मिळावी आणि मराठी भाषेबद्दल आत्मीयता वाढावी या हेतूने साहित्य संघाने हा शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम हाती घेतला आहे.
या स्पर्धेसाठी इयत्ता ७ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांकडून स्वरचित व स्वलिखित कविता मागविण्यात आल्या होत्या. शहरातील ११ शाळांमधील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. विविध शाळांकडून प्राप्त झालेल्या कवितांमधून उत्कृष्ट काव्यलेखनाची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या कवितांचे सादरीकरण २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या सितालक्ष्मी सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती साहित्य संघाचे अध्यक्ष प्राचार्य सदाशिव सुतार, सचिव जनार्दन देवरे,
कार्यवाह अमोल खरे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र सुर्वे, कोषाध्यक्ष विकास काकडे तसेच संदीप देशपांडे, डॉ. जे. वाय. इंगळे, प्रदीप गुजराथी, शांताराम वाघ, मंदोदरी पाटील, प्रिया परदेशी, डी. डी. पाटील, हेमंत वाले, सुरेंद्र भुजंग आणि डी. टी. पवार यांनी दिली
