
. प्रथम क्रमांक प्राप्त
मनमाड ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

द्वितीय क्रमांक प्राप्त
तरुण वर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाबद्दल जागृती व्हावी तसेच टिव्ही, मोबाईल मध्ये गुंतलेल्या तरुण पिढीला मातीशी जोडण्यासाठी, नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शिवयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऐतिहासिक गड – किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. व्ही एन नाईक हायस्कुल च्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांच्या मातीच्या प्रतिकुती तयार केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही एन नाईक हायस्कूल च्या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ धात्रक, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव तथा नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, अशोक परदेशी, संजय कटारे, नरेश गुजराथी, अमर चव्हाण, प्रकाश पठाडे, राकेश कोल्हे, प्रा समाधान सुखदेवे, विक्की सुरवसे, नरहरी उंबरे, मुख्याध्यापक गायकवाड सर उपस्थित होते.

तृतीय क्रमांक प्राप्त
शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारलेले गडकिल्ले बघण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी भेट देत पाहणी करत या कार्याचे कौतुक केले
माजी आमदार जगन्नाथ धात्रक म्हणाले की, क्रमांक कोणाचा आला हे महत्ताचे नाही. ऐतिहासिक गढ-किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी इतिहासाची पाने चाळली, हे महत्त्वाचे. स्पर्धकांनी या प्रयत्नांना स्पर्धेच्या दृष्टीने न बघता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व तरुण वर्गात पोहोचविण्याचा प्रयत्न असे समजावे. पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या जोमाने स्पर्धा घेणार असल्याचे ते म्हणाले.

चतुर्थ क्रमांक प्राप्त
प्रथम क्रमांक के आर टी हायस्कूल, द्वितीय क्रमांक गुड शेफर्ड स्कुल, तिसरा क्रमांक सरस्वती विद्यालय, चौथा क्रमांक संत झेवीयर्स हायस्कूल, पाचवा क्रमांक छत्रे हायस्कूल आणि उत्तेजनार्थ शेहजादी स्कुलच्या संघांना देण्यात आले
धकाधकीच्या वातावरणात ही किल्ले स्पर्धा एक वेगळं चैतन्यच घेऊन आली. केवळ मुलेच नाही तर पूर्ण कुटुंब यात सहभागी झाल्याने त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची ओढ निर्माण होईल असा उपक्रम राबविल्याबद्दल कला शिक्षक, मान्यवरांनी पोलीस – पत्रकार आणि स्पर्धकांचे कौतुक केले.

पाचवा क्रमांक प्राप्त
या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १२५ स्पर्धक या स्पर्धमध्ये सहभागी होते. विजेत्या स्पर्धकांनी बनवलेल्या गड किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते.

उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त
या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परिक्षण कलाशिक्षक काशिनाथ आहेर, आशिष खेमणारे, भूमिका सानप यांनी केले. प्रकल्प संयोजक म्हणून मिलिंद वाघ यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष उपाली परदेशी, जनार्दन देवरे, पाहुण्यांचे परिचय आनंद बोथरा यांनी करून दिला तर आभार अशोक बिदरी यांनी केले. योगेश म्हस्के, गणेश केदारे, रुपाली केदारे, प्रिया परदेशी, दीपाली खरे, आम्रपाली वाघ, नैवेद्या बिदरी, वैशाली मोरे, प्रियांका बोथरा, सतीश शेकदार, निलेश वाघ, विशाल मोरे, अनिल निरभवणे, प्रवीण व्यवहारे यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
