


सिन्नर (प्रतिनिधी )क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी २०२६ रोजी नायगाव (जि. सातारा) येथील जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राजशिष्टाचाराचा (प्रोटोकॉल) जाणीवपूर्वक भंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी सातारा जिल्हा परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये माननीय नामदार श्री. छगनरावजी भुजबळ साहेब — मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे नाव सन्माननीय मंत्री, खासदार व आमदारांच्या खाली व शेवटी टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष बाब म्हणजे, पत्रिकेत त्यांचा उल्लेख विधानसभा सदस्य म्हणून करण्यात आल्याचा आरोप असून, यामुळे राज्याचे जेष्ठ मंत्री व माजी उपमुख्यमंत्री असलेल्या भुजबळ साहेबांचा अवमान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
भुजबळ साहेब हे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ मंत्री असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यानंतर त्यांचा प्रोटोकॉल लागू होतो. असे असताना जिल्हा परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रोटोकॉल डावलून त्यांचे नाव शेवटी टाकल्याने राज्य सरकार व विधिमंडळाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथील निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून देणे व त्या स्थळाचा विकास करणे हे कार्य माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या पुढाकारातून झाले आहे. असे असतानाही त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत नाव शेवटी टाकण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाला “शासनाचा अवमान व हक्कभंग” ठरवत, या कार्यक्रमाचे आयोजक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्यावर कठोर शासकीय कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी सातारा जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सिन्नरचे महामित्र दत्ताजी वायचळे यांनी केली आहे.
