
नाशिक:- मानवी मन हे सदैव विचार करत राहतं. या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. या मनाचे कंगोरे उलगडल्याशिवाय माणूस आपलासा होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक देवीदास खडताळे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही…’ या उपक्रमात ‘कंगोरे मनाचे’ या पुस्तकावर देवीदास खडताळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री सुनंदा पाटील होत्या. खडताळे पुढे म्हणाले की, कवी मनाचा आशय घेऊन मनात सुरू असलेल्या भावना उलगडून दाखवत असतो. मन पावसासारखे असते… कधी रिमझिम तर कधी सरीसारखे बरसत असते. मनात श्रद्धा असायला हवी. आपण दुसऱ्याला समजून घेतले तर एकमेकांमध्ये सहजपणे एक वेगळं नातं निर्माण होतं. दु:ख विसरण्यासाठी आयुष्यातील कोडे दूर करण्यासाठी आपल्यात वैचारिक भावना निर्माण झाली पाहिजे, असे सांगून त्यांनी काही कविता सादर केल्या. अजित कुलकर्णी आणि विश्वास मोरे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.१) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार ‘चळवळ्या माणूस’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
