
कळंब ( प्रतिनिधी, राजेश पुरी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कळंब येथील दयावान प्रतिष्ठानच्या वतीने समाजोपयोगी आणि मानवतावादी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दयावान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला यांच्या संकल्पनेतून मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासत असल्याने सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, ग्रामीण व शहरी भागात भटक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक वेळा पाण्याअभावी जनावरांची अवस्था बिकट होत असल्याचे चित्र दिसून येते. या पार्श्वभूमीवर दयावान प्रतिष्ठानने पुढाकार घेत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून, कळंब व डिकसळ परिसरात विविध ठिकाणी सिमेंटच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून, स्थानिक नागरिकांमध्येही या उपक्रमाचे स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, दीर्घकालीन स्वरूपाचा असून त्यातून सतत पाण्याची उपलब्धता राहील याकडेही लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, त्याच ठिकाणी टाकी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात पाण्याची सोय असल्यासच टाकी बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला व सचिव अभय गायकवाड यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपत मुक्या प्राण्यांच्या जीवनरक्षणासाठी हा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न आहे. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले.
टाकी बसविण्याबाबत इच्छुक नागरिकांनी इम्रान मुल्ला (मो. 9421873111), अभय गायकवाड (मो. 9405101888) व इमरान काझी (मो. 9175704786) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजात मानवता, करुणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ करणारा ठरत असून, इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
