
सिन्नर (प्रतिनिधी)तालुक्यातील वडांगळी येथे गुरू गंगाधर शिवाचार्य वडांगळीकर मठात गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने ( ता.१० जुलै) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी सहा वाजता गुरू गंगाधर शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक करण्यात येऊन विधीवत पूजा ,आरती करण्यात आली त्यानंतर सुशोभित केलेल्या पालखीतून गुरू गंगाधर स्वामींच्या चांदीच्या मूर्तीची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत नाशिक,संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे,जळगाव जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने वीरशैव लिंगायत बंधू,भगिनी सहभागी झाल्या. गुरू गंगाधर शिवाचार्य महाराज,जगद्गुरु पंचाचार्य महाराज, महामंडलेश्वर पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. भजनी मंडळात तल्लीन होऊन फेर धरून महिला नाचत असतानाचे दृश्य आनंददायी होते. या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे, वडांगळीकर महाराज यांची हत्तीवरून काढलेली भव्य मिरवणूक होते.गावातून निघालेल्या मिरवणुकीत महाराजांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला हे दृश्य विलोभनीय होते. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांचा व भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता

.गावातून निघालेली ही मिरवणूक किर्तांगळी रस्त्यावर असलेल्या मठ संस्थांनच्या,वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात विसावली. या ठिकाणी असलेल्या सभागृहात सर्व भक्तगण एकत्र जमले. वडांगळीकर महाराजांचे आगमन झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत गुणवत्ता संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विविध भेटवस्तू ,मेडल व प्रशस्तीपत्र देऊन महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी आपल्या मनोगतात, गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागचा उद्देश व गुरूचे महत्व विषद केले. त्यानंतर प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचनपर प्रवचन झाले.यातून त्यांनी गुरुपौर्णिमा बद्दल माहिती देऊन गुरू शिष्याची प्राचीन परंपरा विषद करून,संसाररुपी भवसागरतून पार होण्यासाठी गुरूंच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाची गरज असते.हे सांगून नित्य शिवपूजा, इश्टलिंग पूजा व सत्कर्म करण्याचे आवाहन केले.या नंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बुधवारी ( ता.९)झालेल्या गुरुदीक्षा सोहळ्यात सुमारे १७० भाविकांनी महाराजांकडून दीक्षा घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक ज्ञाने यांनी केले तर आभार रवींद्र गाडे यांनी मानले.
